गणेश रांगणकर :तालुक्यातील नांदेपेरा भुरकी शिवारात गारपीट झाल्याने उन्हाळी भुईमूंग, मुंग,सोयाबीन पिके धोक्यात आली आहे .त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे
एकेकाळी शेतकरी राजा खरंच राजा होता. मात्र , आता ती केवळ कथा होऊन बसली आहे . सुजलाम् सुफलाम् असलेल्या कृषी प्रधान देशात बळीराजाला हात पसरायची पाळी आली आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचं पुरतं वाटोळं झालंय अवकाळी पाऊस ,गारपीटामुळे उन्हाळी पिके धोक्यात आली आहे त्यामुळे काय खाव ? कसं जगाव ? हा प्रश्न भेडसावतो आहे . मात्र तरीही मायबाप सरकारला घाम फुटत नाही . यंदा खरिपाच्या भरवाशावर पुढील आखणी केली ती धुळीस मिळाली आहे . त्यामुळे " देवा ... आमचं नशीब कुण्या सटवीनं लिहिलंय हा शेतकऱ्यांचा प्रश्न प्रत्येकाच्या काळजाचं पाणी करीत आहे .
तालुक्यात कापूस पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. पांढर सोनं म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या कापसाला भाव मिळेल , या आशेने कापूस घरातच साठवून ठेवला होता . भाव वाढत नसल्याने कवडीमोल किमतीत कापसाची विक्री केली .शेतकऱ्याच्या घरातील कापूस संपल्यावर कापसाचा भाव वाढला .या भाववाढीचा फायदा व्यापारीवर्गालाच झाला.खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पन्न दिवसेंदिवस घटत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . घरदार , कपडालत्ता , मुलांचं शिक्षण , लग्न कार्य , घर संसार , पाहुणचार , सणवार कशावर भागावयचं ? याची चिंता लागली आहे . आमचं शेत आम्हालाच खायायला उठलं आहे . कापूस व सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे . महागडं बी- बियाणं घेऊन काळ्या आईची ओटी भरली , आता खिसे रिकामे झाले आहेत .भरपाई भरून काढण्याकरिता ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे .अशा शेतकऱ्यांनी शेतात भुईमूंग ,मुंग,सोयाबीन या उन्हाळी पिकाची पेरणी केली .मात्र अवकाळी पाऊस व गारपीट ने हे पिके नासधूस झाली आहे .